धुळे : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मंगळवार, १२ मार्च रोजी गुजरातमधून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. स्वतः खासदार गांधी हे थेट हेलिकॉप्टरने मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता नंदुरबारात दाखल होतील. तेथून ते सी.बी.मैदानावरील सभास्थानी जाणार आहेत. नंदुरबारच्या सभेनंतर दुपारी ते धुळे जिल्ह्यातील दोंडाईचाकडे रवाना होणार आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे केंद्रीय व राज्य नेते नंदुरबारात दाखल झाले आहेत.
राहुल गांधी हे सुरत येथून हेलिकॉप्टरने नंदुरबारात दाखल झाल्यानंतर त्यांचा ‘रोड शो’ करायचा किंवा कसा, याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे. मंगळवारी साधारणतः दोन वाजता यात्रा व नेते मंडळी ही दोंडाईचाकडे प्रस्थान करतील, अशी माहिती आमदार के. सी. पाडवी यांनी दिली. यात्रेचे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यात आगमन होणार आहे. दोंडाईचा शहरातील नंदुरबार चौफुलीवर दुपारी ४:३० वाजता जिल्हा काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
तेथून ते पदयात्रेने भावसार ग्राउंडवर पोहोचतील. या यात्रेचा तेथे मुक्काम असणार आहे. राहुल गांधी व त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मुक्कामासाठी दोंडाईचा येथे ४० कंटेनर दाखल झाले आहेत. सोमवारी सकाळी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एम. चेन्नीथला, खासदार जयराम रमेश, खासदार के. सी. वेणूगोपाल, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेते नंदुरबारात दाखल होणार आहेत