मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांचे जोरदार उपोषण सुरु असतांना आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर हल्ला चढवला आहे. मनोज जरांगे हे मारुतीचे शेपूट आहे. ते शांत बसणार नाहीत. त्यांनी आता वयोवृद्ध नागरिकांनाही उपोषणाला बसण्याचे आवाहन केले आहे. यात वृद्धांच्या जिवाला काही बरेवाईट झाले तर थेट जरांगेंना जबाबदार धरले जावे, असे आवाहन भुजबळ यांनी पोलिसांना केले आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्याला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. या मुद्यावरून दोघांमध्ये गत अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे. जरांगे यांनी बुधवारी आपले आंदोलन अधिक उग्र करत यापुढील उपोषणांत मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिकांनाही उतरण्याचे आवाहन केले आहे. तसेच 24 तारखेपासून गावोगावी रास्ता रोको करण्याचाही इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याचा छगन भुजबळ यांनी गुरुवारी चांगलाच समाचार घेतला.
मनोज जरांगे यांना काही कळत नाही. आता त्यांनी विनाकारण गाव बंद करण्याचा इशारा दिला आहे. कहर म्हणजे ते वयस्कर लोकांनाही उपोषणाला बसवत आहेत. या नागरिकांच्या जिवाला काही झाले तर काय करायचे? सरकार सर्वच गोष्टींवर सकारात्मक विचार करत आहे. पण ते उगीचच गैरसमज निर्माण करत आहेत. ते प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काहीही बरळत आहेत. त्यांनी 10 तारखेच्या उपोषणासाठी समाजातील लोकांनाही विश्वासात घेतले नव्हते. श्रेय घेण्यासाठी ते स्वतःच उपोषणा जाऊन बसले, असे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे.
छगन भुजबळ यांनी यावेळी पोलिसांना उपोषणात ज्येष्ठ नागरिकांच्या जिवाला काही झाले तर जरांगे यांना जबाबदारा धरण्याचेही आवाहन केले. आंदोलनात वयस्कर लोकांना काही झाले तर पोलिसांनी जरांगे यांना जबाबदार धरावे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यातच हे रस्ते बंद करत आहेत. त्यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही. ते प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करत आहेत. ते 10 तारखेला उपोषणाला बसले. त्यावेळी त्यांनी समाजाला विश्वासात घेतले होते का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.