मध्यप्रदेश : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच भरधाव वेगात असलेल्या कारचालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी ट्रक अचानक कारवर कोसळला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. यासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामप्रकाश, जय देवी, रोशनी आणि गीता अशी मृतांची नावे आहेत. सुमित आणि राखी अशी गंभीर जखमी झालेल्या बहिण भावांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड जिल्ह्यातील सारंगपूर येथील रहिवासी असलेले शाक्य कुटुंब अल्टो कारमधून भिंडकडे जात होते.
गुना बायपासवरून जात असताना कारचालकाने कचऱ्याने भरलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अचानक ट्रक कारवर उलटला. या अपघातात कारचा पूर्णत: चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारवर पडलेला ट्रक जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आला. सर्व मृत आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. शाक्य कुटुंब मूळ भिंड जिल्ह्यातील लाहार येथील रहिवासी आहे. कुटुंबातील एक सदस्य राजगड जिल्ह्यातील सारंगपूर येथे सरकारी नोकरीला होता. त्यामुळे हे कुटुंब सारंगपूरला राहत होते.