यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील अट्रावल या गावात अज्ञाताने शेतकऱ्याच्या कापणी योग्य केळी पिकाचे नुकसान केले आहे. तब्बल दोन हजार केळीचे घड कापून नासधूस केल्याने शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. यावल पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर या घटनेमुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील अट्रावल येथील शेतकरी राजेंद्र व्यंकट चौधरी यांनी चिंतामण पंढरीनाथ तायडे यांचे शेत कसले: आहे. त्यात त्यांनी त्यांनी केळी पिकाची लागवड केली होती आणि आता केळी कापणीवर आली आहे, तर दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी कापणीवर आलेल्या केळीचा व्यवहार व्यापाऱ्यांसोबत केला होता.
प्रती घड ५ हजार ५०० रुपयांत दिला होता व त्यातील दीड हजार घड कापणीदेखील झाली होती. तर उर्वरित केळीच्या घडांपैकी दोन हजार केळीच्या झाडावरील घड शुक्रवारी मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात माथेफिरूने त्यांच्या शेतात जाऊन कापून नासधूस केली. यात शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात चिंतामण तायडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरू व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.