नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक राज्यात शेतीच्या वादातून असो वा रस्त्याच्या वादातून असो छोटे मोठे भांडण सुरु असतांना पण सध्या राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील बयाना गावात रस्त्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा ट्रॅक्टरने चिरडून हत्या करण्यात आली. आरोपीने ट्रॅक्टरचे चाक तरुणाच्या अंगावर 8 वेळा घातले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे.
सदर पोलीस ठाण्याचे एसएचओ जयप्रकाश परमार यांनी सांगितले की, अड्डा गावातील बहादूर गुर्जर आणि अतारसिंग गुर्जर गटामध्ये रस्त्याच्या संदर्भात बराच काळ वाद सुरू आहे. या वादावरून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन्ही पक्ष पुन्हा आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक केली. हाणामारीत दोन्ही बाजूंच्या महिलांचाही सहभाग होता. लढत असताना 35 वर्षीय निरपत गुर्जर जमिनीवर पडला. तेव्हा एका तरुणाने निरपतवर ट्रॅक्टर चालवला. थांबवूनही आरोपी ट्रॅक्टर चालकाने न थांबता जमिनीवर पडलेल्या निरपतवर ट्रॅक्टरचे चाक 8 वेळा चालवले. जखमी निरपतचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बयाना सीएचसी येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मारामारीदरम्यान गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. आरोपी ट्रॅक्टर चालकाची ओळख पटवली जात आहे.