अमरावती : वृत्तसंस्था
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे दाट धुक्यामुळे चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन ५०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात चार तरुण ठार झाले. तर, चार गंभीर जखमी झाले आहेत. मडकी (ता. चिखलदरा) येथे रविवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. मृत व जखमी तेलंगणातील आदिलाबाद येथील आहेत.
आठ युवक रविवारी सकाळी चारचाकीने चिखलदरा येथे फिरण्यासाठी येत होते. अपघातात चालक शेख सलमान शेख चांद (२८), शिवा कृष्णा अदांकी (३०), वैभव लक्ष्मना गुल्ली (२९) व वानापारथी कोटेश्वर राव (२७) यांचा मृत्यू झाला. जखमींना त्वरित अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. सर्व तरुण तेलंगणा ग्रामीण बँकेचे कर्मचारी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. चिखलदरा परिसरात सध्या पावसाळी मोसम असून परिसरावर धुक्याची चादर पसरली आहे. चालकास घाटातील वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे हा अपघात झाला.