जळगाव : प्रतिनिधी
धामणगाव जवळील तापी नदीपात्रामध्ये अंघोळ करत असताना अचानक फिट आल्याने रवींद्र आत्माराम कोळी (३०, रा. जैनाबाद) या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जैनाबाद येथील रवींद्र कोळी हा तरुण सेंट्रींग काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी रात्री धामणगाव येथे तो मित्रांसोबत हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. रात्रभर तेथेच मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी तो मित्रांसोबत गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पात्रात अंघोळ करण्यासाठी गेला. रवींद्र हा एकटाच नदीपात्रामध्ये अंघोळ करीत होता. तर त्याचे दोन मित्र काही अंतरावर बसलेले होते. अचानक रवींद्र याला फिट आल्याने तो पाण्यात बुडू लागला. यावेळी नदीपात्राच्या दुसऱ्या तिरावर असलेल्या काही जणांना तरुण बुडत असल्याचे दिसताच त्यांनी आरोळी मारुन त्याच्या मित्रांना रवींद्र बुडत असल्याचे सांगितले. मित्रांनी लागलीच रवींद्रला पाण्यातून बाहेर काढले. तोपर्यंत त्याच्या नाका तोंडात पाणी गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार माणिक सपकाळे हे करीत आहे.