Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कोण होत्या या लाटणंवाल्या बाई ?
    राजकारण

    कोण होत्या या लाटणंवाल्या बाई ?

    editor deskBy editor deskOctober 8, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हि कोणत्याही राजे राजवाड्याची गोष्ट नाही किवा कोणत्या आटपाट नगराचीहि नाही मात्र, तरीही काहिशी जादूई आणि सकारात्मक बोध देणारी. ही गोष्ट आहे मुंबईतल्या मध्यमवर्गीय घरातील महिलांची, पन्नास वर्षांपूर्वीची… त्यांच्या लढ्याची आणि खंबीर नेतृत्वाची… देशभर गाजलेल्या आंदोलनाची. लाटण मोर्चाची आणि हा मोर्चा उभा करणाऱ्या लाटणवाल्या बाईंची.

    लाटणं मोर्चा ही संकल्पना किंवा आंदोलनाची प्रतिमा साकारली ती मुंबईत. महागाई, तुटवडा, काळाबाजार, पाण्याची टंचाई या सगळ्या विरोधात महिलांचं आंदोलन उभं राहिलं. हजारो महिला लाटणं घेऊन मंत्रालयावर चालून गेल्या. चलनवाढ, भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्यानंतर बांग्लादेशमधील निर्वासितांचे देशात आलेले लोंढे या सगळ्याचा ताण भारताच्या अर्थव्यवस्थेवर आला होता. अन्नधान्याची टंचाई भासू लागली, इंधनाचे दर वाढले, साठेबाजी वाढली. कामगारांचे संप होऊ लागले, कारखाने बंद पडले, हजारोंच्या नोकऱ्या गेल्या. रेशनच्या दुकानांसमोर तासन् तास रांगा लागलेल्या असायच्या. स्वयंपाक घरातील अत्यावश्यक गोष्टीही सहजी मिळत नव्हत्या. महागाई विरोधात देशभर आंदोलनं उभी राहिली. मात्र त्यात गाजला तो महिलांच्या पुढाकाराने झालेला लाटणं मोर्चा. १३ सप्टेंबर १९७२ या दिवशी हा लाटणं मोर्चा उभा राहिला. आताही महागाई, भाववाढ यांची चर्चा होत असताना या देशभरात गाजलेल्या आंदोलनाला पन्नास वर्ष पूर्ण झाली.

    समाजवादी पक्षाच्या तत्कालीन आमदार मृणाल गोरे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होत. त्यांनी मुंबईत महागाई प्रतिकार संयुक्त महिला समिती स्थापन केली. मुंबईत निघालेल्या या लाटण मोर्चाचं लोण हळूहळू देशभर पसरलं. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये महिला महागाई विरोधातील आंदोलनामध्ये लाटणं घेऊन उतरू लागल्या. पक्षीय मतभेद बाजूला सारून सर्व पक्षातील नेत्या या आंदोलनात सामिल झाल्या होत्या. मृणालताईंसह, प्रमिला दंडवते, अहिल्या रांगणेकर, कमल देसाई, तारा रेड्डी यांसह तत्कालिन महिला नेत्या सहभागी झाल्या होत्या. अगदी सत्ताधारी पक्षातील महिला नेत्याही या आंदोलनाचा भाग झाल्या. मुंबईतील पाणीटंचाईचा प्रश्न मृणालताईंनी आंदोलन करून धसास लावला त्यानंतर त्यांना ‘पाणीवाली बाई’ अशी ओळख मिळाली. महागाईच्या विरोधात आंदोलन उभं करताना घेतलेल्या सभांमध्ये ‘सरकारला लाटण्याने बडवलं पाहिजे…’ असं एक महिला कार्यकर्ती संतापाने म्हणून गेली आणि त्यानंतर मृणालताईंच्या नेतृत्वाखाली लाटणं हे महिलांच महागाई विरोधातील शस्त्र झालं. लाटणं घेऊन महिला मोर्चे काढू लागल्या आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या मृणालताईंची ओळख ‘लाटणवाल्या बाई’ अशी झाली.

    लाटण मोर्चा हे महिलांमध्ये महागाईबाबत असलेल्या संतापाच प्रतीक झालं. मात्र त्या जोडीला अधिकारी, मंत्री यांना घेराव घालणे, मंत्रालयात शिरून प्रश्न विचारणे, जाहीर सभांमध्ये प्रश्न विचारणे अशी आंदोलने सुरू होती. शासनाला अखेर या आंदोलनांची दखल घ्यावी लागली. साठेबाजी विरोधात कारवाई सुरू झाली, जीवनावश्यक वस्तूंचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी निर्णय घ्यावे लागले. हे खचितच या मोर्चाचे फलित. मात्र त्यापलीकडे जाऊन या आंदोलनाने जादू केली होती. मुंबईतील चाळीचाळीमधील हजारो स्वयंपाकघरांपर्यंत हे आंदोलन पोहोचलं. कधीही फारशा घराबाहेर न पडलेल्या हजारो महिला संघटीत झाल्या. काही मोबदल्यात मोर्चामध्ये घोषणा देण्यासाठी नाही तर उत्स्फूर्तपणे महिला सहभागी झाल्या. आपले प्रश्न आपण मांडले पाहिजेत ही उर्मी जागृत झाली. महिलांनी उभ्या केलेल्या लढ्यांची परंपरा या देशात अगदी स्वतंत्र्यपूर्व काळापासून असली तरीही मोर्चे, आंदोलन, राजकारण, समाजकारण यांपासून दूर राहिलेला मोठा महिलावर्ग कायम होता. त्यातील अनेकींना या मोर्चाने आत्मविश्वास दिला. महिलांनी उभं केलेल आंदोलन अशी ‘लाटण मोर्चा’ची नोंद इतिहासात झालीच पण त्यानंतरही अनेक चळवळींशी महिला जोडल्या गेल्या. महिलांच्या प्रश्नांबाबत मृणालताईंनी सुरू केलेल्या उपक्रमांची व्याप्ती वाढली. कुटुंब नियोजन, महिलांचं आरोग्य अशा अनेक प्रश्नांबाबत सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांना महिलांचा प्रतिसाद वाढला, अशी आठवण मृणालताईंबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितली.
    सभा, आंदोलन यासाठी माणस पुरवण्याचे कंत्राट देण्याघेण्याच्या सध्याच्या काळात हजारो महिलांनी एखाद्या प्रश्नासाठी आपणहून कशा आल्या? याच उत्तर तो काळच वेगळा होता… हे अर्थातच आहे. पण मृणाल गोरे आणि समकालीन महिला नेत्यांचं नेतृत्व आणि वक्तृत्व हाही त्यातील महत्त्वाचा भाग. संपर्काची साधनं तुलनेनं कमी असताना या नेत्यांचा घरोघरी असलेला संपर्क, प्रश्नांची आणि नेमक्या उत्तरांची जाण यातून चळवळी उभ्या राहात होत्या. महिलांना भावतील अशी प्रतिक हेरून चळवळींची प्रतिमा उभी करण्याच श्रेय मृणालताईंच. हातातील लाटण, डोईवरचा हंडा अशा तत्कालीन महिलांच्या भावविश्वातील अविभाज्य वस्तूंचा व्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी केलेला वापर हा नक्कीच महिलांना भावणारा होता. अगदी आजही पक्ष, गट, संघटनांमधील महिला न्याय मागण्यासाठी लाटणं घेऊन आंदोलनात, मोर्चात सहभागी होतात. शासकांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना लाटण्याने बडवतात!

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.