
जामनेर : प्रतिनिधी
पहूर येथून जवळच असलेल्या शेंदुर्णी रस्त्यावरील गोंदेगावजवळ पोषण आहार योजनेच्या धान्याची वाहतूक करणाऱ्या ४०७ मालवाहू टेम्पोचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात मागील बाजूस बसलेले दोन हमाल खाली फेकले गेले. या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोषण आहार योजनेचे धान्य वाहून नेणारा ४०७ मालवाहू टेम्पो (एमएच-१४, एफ- ३५०४) हा १५ सप्टेंबरला सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास पाचोऱ्याकडून जामनेरच्या दिशेने येत होता. या टेम्पोच्या मागील भागात धान्याच्या गोण्यांवर पाचोरा येथील कृष्णापुरीतील जगदीश लालचंद पाटील (वय ४१) आणि पाचोऱ्यातीलच बहिरम नगरमधील अर्जुन तुकाराम पाटील (वय ५२) हे हमाल बसले होते. दरम्यान, गोंदेगावजवळ ऋषीबाबा मंदिराजवळ अचानक वाहनाच्या मागील चाकाचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. तर टायर फुटल्यामुळे वाहन मागे यायला लागले.
यामुळे टेम्पोच्या मागील बाजूस बसलेले अर्जुन पाटील आणि जगदीश पाटील हे हमाल गाडीबाहेर फेकले गेले. यामुळे त्यांना गंभीर इजा झाल्याने दोन्ही हमालांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, पहर पोलीस ठाण्याचे ए.पी.आय. प्रवीण दात्रे, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे व त्यांचे सहकारी घटनास्थळी धावले व मदतकार्य केले. दोघा मयत मजुरांचे पहुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिबरे करत आहेत. या दुर्दैवी अपघातात दोन्ही मजुरांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पाचोऱ्यासह पहुर, शेंदुर्णी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाचोरा येथून निघालेला पोषण आहार कोणत्या केंद्रासाठी जात होता, या वाहतुकीचे कंत्राट कुणाकडे होते आणि वाहतुकीदरम्यान सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, माल वाहणारे वाहन सुस्थितीत होते, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या अपघाताची जबाबदारी घेऊन मृत हमालांच्या वारसांना संबंधितांकडून आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



