
जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वर पाळधी ते तरसोद बायपास रस्त्यावर खचलेल्या ओव्हरब्रिजच्या दुरुस्तीदरम्यान सुरक्षेची कोणतीही काळजी न घेतल्याने रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. ट्रक व तवेराच्या अपघातात एक ठाण तर चौघे जखमी झाले. कंत्राटदार ‘अॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, जी. एम. दत्ता यांच्यासह संबंधित साइट अधिकायांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला.
पोलिस अंमलदार अजय भोंबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाळधी ते तरसोद फाटा दरम्यानच्या नवीन रस्त्याचे व ओव्हरब्रिजचे बांधकाम अॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने केले आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये हे काम पूर्ण झाले. कराराच्या अर्थीनुसार पुढील तीन वर्षे रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची आहे. मात्र, पहिल्याच पावसात ओव्हरब्रिजचा रस्ता खचल्याने कंपनीने दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यासाठी एक लेन बंद करून दुसरीवरून वाहतूक सुरू ठेवली होती. कामाच्या ठिकाणी ‘काम सुरू आहे’ असे दर्शवणारे कोणतेही रिफ्लेक्टिव्ह बोर्ड, बेरिकेडिंग, घोक्याचे ब्लिंकर्स किंवा रात्रीच्या वेळी वाहनचालकांना सावध करण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला नव्हता असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
रविवारी रात्री २ वाजता बायपासवर दुरुस्ती सुरू असलेल्या लेनवर ट्रक (क्रमांक एमएच ०५ डीके ५३१४) आणि तवेरा (क्रमांक एमएच ४८ पी ०७५५) यांची धडक झाली. तवेरामधील शांताराम केशव पाटील (वय ५८, रा. शेंदखेडा) हे गंभीर जखमी झाले व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रामचंद्र ईश्वर महाजन यांच्यासह अन्य चौघे जखमी आहेत.
जळगाव तालुका पोलिसांनी अॅग्रो इनकाचे एमडी शैलेंद्र सिंघल, जी.एम. दत्ता व साइट अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम १०५, २९०, ३(५), मोटार वाहन कायदा १९८-अ व सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला.



