चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरालगतच्या डेराबर्डी परिसरातील समर्थ पाव बेकरीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणावर जुन्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना ३ जून रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डेराबडी येथील जखमी अजय शिवाजी चव्हाण (वय २४) हा समर्थ पाव बेकरीमध्ये कारागीर म्हणून काम करतो. अजयच्या फिर्यादीनुसार, त्याची बहिण आणि संशयित ममराज हरीलाल जाधव यांच्यात पूर्वी ओळख असल्यामुळे काही वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. हा वाद समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही ममराज जाधव हा जुन्या वादाची कुरापत काढून वारंवार भांडण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी अजय चव्हाण हा नेहमीप्रमाणे बेकरीत काम करत असताना दुपारी २.३० वाजता ममराज जाधव व त्याच्यासोबत एक अनोळखी युवक बेकरीत आले. दोघांनी अजयसोबत वाद घालून शिवीगाळ केली.
त्यानंतर त्यांनी कमरेला खोसलेले लोखंडी कोयते काढून अजयवर हल्ला चढवला. ममराज जाधव याने अजयच्या चेहऱ्यावर कोयत्याने वार केला, तर त्याच्या साथीदाराने पाठीमागून पाठीत कोयत्याचा वार केला. त्यानंतर हात व पायावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. हल्ल्यादरम्यान मदतीसाठी धावून आलेल्या कामगारांनाही धमकावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. जखमी अजय चव्हाण याला नातेवाईक व सहकाऱ्यांनी तातडीने खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले. या प्रकरणी ममराज जाधव व त्याच्या अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चाळीसगाव पोलिस तपास करत आहेत.



