जळगाव : प्रतिनिधी
आयटी क्षेत्रात करिअर घडविण्याचे स्वप्न घेऊन शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीने आपल्यावर गंभीर स्वरूपाचा मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. संबंधित प्रकरणामुळे आयटी क्षेत्रात तसेच सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिची ओळख तानिश शेख या तरुणाशी झाली. त्याने मोठ्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर हळूहळू त्याने जवळीक वाढवत मानसिक दबाव निर्माण केल्याचा आरोप तिने केला आहे.
तरुणीच्या तक्रारीनुसार, नोकरी मिळाल्यानंतर तिच्यावर छळ सुरू झाला. तसेच तानिश शेखसोबत तौसिफ अख्तर आणि निदा खान यांनीही संगनमत करून दबाव व धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. धर्मावरून बोलून मानसिक छळ करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तिचे म्हणणे आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. त्यानंतर खासगी फोटो व माहिती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचेही तिने सांगितले. या दबावामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचे तिने स्पष्ट केले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये संबंधित व्यक्ती विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती समोर आल्याचेही तिने सांगितले. आपल्याला जाणूनबुजून फसवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाला काही माध्यमांमध्ये “कॉर्पोरेट जिहाद” असा उल्लेख करून वेगळे वळण दिले जात असल्याचे दिसत आहे. मात्र अद्याप कोणत्याही यंत्रणेकडून या स्वरूपाच्या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणाची काही स्तरांवर चौकशी सुरू असल्याचे दावे करण्यात येत असले तरी अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनीही याबाबत सध्या कोणतीही ठोस माहिती देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे आयटी क्षेत्रातील महिला सुरक्षितता, कामाच्या ठिकाणची पारदर्शकता आणि डिजिटल छळ या विषयांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.



