मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात झालेल्या चर्चेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या संदर्भात मोठा गौप्यस्फोट करत, अजित पवार यांच्याशी विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे स्पष्ट केले आहे.
शिंदे म्हणाले की, “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. मात्र त्यावेळी अजित पवार गटातील काही पदाधिकारी अशा चर्चेला नकार देत होते. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आम्ही या विषयावर बोलणे टाळले. पण उशिरा का होईना, आता त्यांनीही सत्य मान्य केले आहे.” तसेच या चर्चेत नेमके काय घडले, याचा खुलासा अजित पवार गटाने करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
सामाजिक विषयांवर बोलताना शिंदे यांनी समाजाधारित राजकारणावरही टीका केली. “कोण व्यक्ती कुठल्या समाजाचा आहे यापेक्षा त्याच्या विचारांची आणि कार्याची दखल घेणे महत्त्वाचे आहे. थोर व्यक्तींना विशिष्ट समाजाशी जोडण्याचा प्रयत्न केल्यास समाजात तेढ निर्माण होऊ शकते,” असे ते म्हणाले. महाराष्ट्रात सध्या धर्मवाद वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अजित पवार गटावर टीका करताना शिंदे म्हणाले की, “विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली होती. मात्र सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झाली नव्हती. त्यामुळे त्या विषयावर बोलणे योग्य नाही.” रोहित पवार यांच्यावर होणारी टीका ही बालिशपणाचे लक्षण असल्याचे सांगत, “राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही नाही तर अजित पवार गटाचा मित्रपक्षच अडचणीत आणत आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
याचवेळी त्यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “या अपघाताच्या तपासाबाबत नेमकी काय कारवाई सुरू आहे, हे स्पष्ट व्हायला हवे. तसेच अशोक खरात प्रकरणातही काही मोठे कारण दडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, राहुरी येथील पोटनिवडणुकीबाबत बोलताना शिंदे यांनी सांगितले की, भाजपने दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या जागी त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार देण्याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या सर्व वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणे आणि भविष्यातील राजकीय घडामोडींची चर्चा रंगू लागली आहे.



