मुंबई : प्रतिनिधी
मुंबई शहरातून गेल्या ३६ तासांत तब्बल १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ८ मुलींचा समावेश असून, ही मुले मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झाल्याची नोंद आहे. या गंभीर घटनेची दखल घेत मुंबई पोलिसांनी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.
दरम्यान, या घटनांमागे मानव तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांचा हात असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७ (२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही पालकांना खंडणीचे कॉल आलेले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
बेपत्ता मुलांची नोंद असलेली ठिकाणे
शिवाजीनगर – ४, साकीनाका – २, अँटॉप हिल – २, तर ओशिवरा, मानखुर्द, बांगूर नगर आणि घाटकोपर येथून प्रत्येकी १ मूल बेपत्ता झाल्याची नोंद आहे.
मुंबई पोलिसांनी बेपत्ता मुलांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, शहरातील गजबजलेल्या बाजारपेठा, सार्वजनिक बागा, रेल्वे स्थानके, बस डेपो, रुग्णालये, बालगृहे आदी ठिकाणी मुलांचे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी, पायी गस्त आणि तांत्रिक सर्वेक्षण वाढवण्यात आले असून, स्वतंत्र पथके शोधकार्यासाठी नेमण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. जून ते डिसेंबर २०२५ या कालावधीत १४५ मुले बेपत्ता झाली होती, त्यापैकी ९३ मुली होत्या. तर १ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या अवघ्या ३६ दिवसांत ८२ जण बेपत्ता झाल्याची नोंद असून, त्यामध्ये ४१ मुली व १३ मुले होती.



