मुंबई :वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलिनीकरणाबाबत हालचाली सुरू होत्या, अशी महत्त्वाची कबुली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
जयंत पाटील यांच्या या खुलाशामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यामागील पडद्यामागचे प्रयत्न प्रथमच उघड झाले असून, हे विलिनीकरण केवळ राजकीय कारणांमुळे नव्हे तर निवडणूक प्रक्रियेमुळे रखडले, हे स्पष्ट झाले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “मी, अजित पवार, शशिकांत शिंदे आणि इतर काही नेते एका बैठकीसाठी एकत्र आलो होतो. या बैठकीत विलिनीकरणाबाबत सविस्तर चर्चा झाली होती. लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यावर सर्वांची सहमती होती. सुनील तटकरे यांनाही बोलावण्यात आले होते; मात्र काही कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.”
ते पुढे म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस याआधीच एकत्र आल्या असत्या. मात्र निवडणूक आयोगाने आधी नगरपालिकांच्या निवडणुका, त्यानंतर महापालिका आणि लगेचच जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे विलिनीकरणासाठी आवश्यक असलेला वेळच मिळू शकला नाही.”
जयंत पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा करत सांगितले की, “त्यावेळी निवडणूक आयोगातील एका अधिकाऱ्याशी माझे थेट बोलणे झाले होते. विलिनीकरणासाठी किमान चार दिवसांचा वेळ द्यावा आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक जाहीर करावी, अशी विनंती आम्ही केली होती. मात्र ते शक्य झाले नाही. त्यामागची कारणे सध्या उघड करणे योग्य ठरणार नाही.”
जयंत पाटील म्हणाले, “जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची औपचारिक घोषणा करायची, असा निर्णय झाला होता. त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतही विलिनीकरणावर एकमत झाले होते.” ते पुढे म्हणाले, “५ व ७ फेब्रुवारी रोजी मतदान असल्याने ८ फेब्रुवारीला घोषणा करण्याचे ठरले होते. मात्र त्या दिवशी मी उपलब्ध नव्हतो. त्यामुळे १२ फेब्रुवारीला घोषणा करण्याचा विचार सुरू होता.”
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकत्र येणार का, यावर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटील यांच्या या खुलाशामुळे विलिनीकरणाबाबतचे प्रयत्न आणि त्यामागील अडथळे पहिल्यांदाच स्पष्ट झाले असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.



