विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र : जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दोंडाईचा नगरपंचायतीच्या निवडणुकीत ज्या पद्धतीचा पॅटर्न राबवण्यात आला होता, तोच पॅटर्न आता जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत राबवला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाकडून साम-दाम-दंड-भेद या नीतीचा उघडपणे वापर करून उमेदवारांसह सूचक व अनुमोदकांवर दबाव आणण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपशी संबंधित काही टोळक्यांकडून विरोधी पक्षांच्या उमेदवारांकडे तसेच त्यांच्या सूचक व अनुमोदकांकडे थेट भेटी देऊन माघार घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. काही ठिकाणी पैशांचे अमिष दाखवून सूचक व अनुमोदकांना उमेदवारी अर्जातून माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे अनेक उमेदवार तसेच त्यांचे समर्थक भयभीत झाले असून, निवडणूक प्रक्रियेतील माघारीचा दिवस येईपर्यंत नेमके काय घडते, याकडे संपूर्ण जळगाव शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
या दबाव तंत्राला कंटाळून काही विरोधी पक्षांनी आपले उमेदवार तसेच सूचक- अनुमोदक यांना धुळ्याबाहेर सुरक्षित ठिकाणी रवाना केल्याची माहितीही पुढे आली आहे. लोकशाही प्रक्रियेत मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक लढवण्याचा अधिकार असताना, अशा प्रकारे धमकी, दबाव व प्रलोभनाचा वापर होणे म्हणजे लोकशाहीची सर्रास पायमल्ली असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दोंडाईचा नगरपंचायतीच्या निवडणुकीतही अशाच पद्धतीने दबाव टाकून अनेक उमेदवार व सूचकांना माघार घेण्यास भाग पाडले गेले होते. आता तोच ‘दोंडाईचा पॅटर्न’ जळगाव राबवला जात असल्याने, ही केवळ योगायोगाची बाब नसून सुनियोजित राजकीय खेळी असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार सत्ताधारी भाजपकडून सुरू असल्याचे चित्र समोर येत असून, दर्जाहीन राजकारणाचा कळस गाठला जात असल्याची टीकाही होत आहे.
लोकशाही ही मतदारांच्या विश्वासावर उभी असते. मात्र, पैशांचे अमिष, धमकी आणि दबाव तंत्राच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न झाले तर तो लोकशाहीचा अपमान ठरेल, अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहे. प्रशासन व निवडणूक आयोग या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, तसेच माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत जळगावातील राजकारण कोणते वळण घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.



