चोपडा : प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदी, विक्री दुकान (नंबर ४) मध्ये दोन चोरट्यांनी एक लाख ४६ हजारांची चोरी केली. त्यांना पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात जेरबंद केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे व पथकाने ही कारवाई केली असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील व्यापारी नितीन लखीचंद दहाड (वय ४८) यांनी यांनी १४ रोजी दुपारी गावातीलच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून २ लाख रूपये देण्यासाठी काढून आणले होते. या पैशांमधून त्यांनी ५४ हजार रूपयांचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी १ लाख ४६ हजार रूपये त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील दुकानामधील कपाटात ठेवले. त्यानंतर ते दुपारी २.३० वाजेच्या सुमारास दुकानासमोर थोड्या अंतरावर वजन काट्यावर धान्य पाहण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांनी दुकानातील कपाटाला कुलूप लावले नव्हते. थोड्या वेळाने नितीन दहाड दुकानात परत आल्यानंतर त्यांनी कपाटातील पैसे पाहिले असता १ लाख ४६ हजार रूपये दिसले नाहीत. त्यांनी या पैशांचा सगळीकडे शोध घेतला, परंतु ते मिळाले नाहीत. त्यानंतर त्यांनी तत्काळ अडावद पोलिस ठाणे गाठून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल कादिर शेख, कैलास बाविस्कर, शरीफ तडवी, ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या पथकाने अवघ्या अर्ध्या तासात परिसर पिंजून काढला. पोलिसांनी गावातील इंदिरा नगर प्लॉट भागात राहणाऱ्या रवींद्र भरत कोळी (वय २२) व शेतकऱ्यांना घनश्याम नवल महाजन (वय १९) या दोघांना जेरबंद केले. या दोघांकडून मुद्देमाल जप्त करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अडावद पोलिसांनी केलेल्या या तत्काळ कारवाईचे गावासह परिसरातील कौतुक केले जात आहे.