अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरातमधील मोरबीमध्ये काल सायंकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100हून अधिक जण जखमी झाले आहेत. सुमारे 400 हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावासाठी एनडीआरएफ आणि गरूड कमांडोंकडून घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. दरम्यान, 5 दिवसांपुर्वीच हा पूल दुरुस्त करण्यात आला होता.
मोरबीमध्ये मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यानं आतापर्यंत १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून मदतकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाची क्षमता केवळ 100 लोकांचीच आहे. मात्र दुर्घटना घडली त्यावेळी या पुलावर तब्बल 300 ते 400 जण उपस्थित होते. पूल कोसळल्यानं शेकडो लोक नदीत बुडाले आहेत. अशातच यासंदर्भात आणखी एक माहिती समोर येत आहे. गुजरातमधील खासदार मोहन कुंदारिया यांच्या नातेवाईकांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. कुंदरिया यांचे तब्बल 12 नातेवाईक या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले असून बहिणीच्या सासरच्या मंडळींचा समावेश आहे.
यामुळे पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. पुलाची देखभालदुरुस्ती करणाऱ्या कंपनींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच अधिक चौकशीसाठी एसआयटीचीही स्थापना करण्यात आली आहे. 100 जणांची क्षमता असलेल्या पुलावर दुर्घटनेवेळी 400 जण उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बचावकार्यासाठी तातडीनं पथकं पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात एक ट्वीट देखील केलं आहे. दरम्यान आज पंतप्रधान मोदी घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे.