जळगाव : प्रतिनिधी
परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झालं आहे. कालपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असून आज राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आजपासून तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
खरंतर, जून महिन्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात दमदार हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाले. अशातच आता महाराष्ट्रातून पाच ते दहा ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे काल दसऱ्याच्या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अशातच आज हवामान खात्याकडून विदर्भासह मराठवाड्यावा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा यलो अलर्ट लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आजपासून ते ८ ऑक्टोबर या तारखेपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मागील काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अनेक नुकसान झाले. त्यातच आता पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे कपास, ज्वारी, मकासह अनेक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.