औरंगाबाद : वृत्तसंस्था
अनेक दिवसांपासून पालकमंत्र्यांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी सरकारला घेरण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. अखेर शनिवारी संध्याकाळी शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये शिंदे गटातील संदिपान भूमरे यांची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. या पदावर वर्णी लागताच भूमरे यांनी दोन मोठे दावे केले असून, त्यांच्या या दाव्यांनंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच अनेक चर्चांना उधाण आले आहे.
औरंगाबादमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर असून, यावरून चांगलेच वातावरण तापलेले असून, येत्या वर्षभरात शहराचा पाणीप्रश्न तडीस नेणार असल्याचा दावा भूमरे यांनी केला आहे. पाणी प्रश्नावरून मध्यंतरीच्या काळात मविआ आणि भाजपमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप करण्यात येत होते. एवढेच नव्हे तर, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावरून औरंगाबाद येथे जलाक्रोश मोर्चा काढला होता. त्यानंतर आता भूमरे यांनीदेखील वर्षभरात शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली आहे.
यावेळी त्यांनी येत्या दसरा मेळाव्यापासून शिंदे गटासात मोठी इन्कमिंग होणार असल्याचा दावादेखील भूमरेंनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून, अनेक पुढारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा भूमरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करत खैरे म्हणजे औरंगाबाद शहराचे भकास पालकमंत्री होते असा टोला लगावला आहे.