परभणी : वृत्तसंस्था
शिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. याच भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.
अब्दुल सत्तार हे परभणीमध्ये बोलत होते. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, येणाऱ्या काळात आमच्याकडे चार-पाच आमदार आणि दोन तीन खासदारही येणार आहेत. शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कोणी धमकावत असेल, तर त्याच्या अरेला कारे करा. त्याने एक मारली तर चार मारा. अधिकारी जर सामान्य शिवसैनिकांचं काम करत असतील तर ते त्यांच्यावर उपकार करत नाही. ते त्यांचं कर्तव्य आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना अब्दुल सत्तार म्हणाले की, ग्रामपंचायत सदस्यांनाही मेजॉरिटी कळते, पण यांना कळली नाही. हे फक्त निवेदन घेऊन मागे द्यायचे. आत्ताचे मुख्यमंत्री निवेदन घेऊन प्रश्न सोडवतात. यासोबतच त्यांनी आणखी चार पाच आमदार आणि दोन तीन खासदार आपल्या गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. हिंदू गर्व गर्जना यात्रेनिमित्त राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार परभणीत होते. यावेळी शिदें गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.