पुणे : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून त्यांना आणि भाजपच्या नेत्यांना जाहीर भाषणाला बोलवून आपण निवडून आलात आणि म्हणून तुमच्या आमदारांची संख्या 55 पर्यंत गेली. तुम्ही जर त्यावेळी वेगळा लढला असता तर तुमचे 20 आमदार देखील निवडून आले नसते अशी टीका शिवसेनेवर मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
महाजन पुढे म्हणाले, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरीनंतर सातत्याने शिवसेनेतील बंडखोर गटाला सातत्याने ‘गद्दार’ असे संबोधत केले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी आमदारांवर वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले आहेत. त्यावर ज्या वेळेला तुम्ही अडीच वर्षापूर्वी आमच्या सोबत विधानसभेला लढलात त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलात मग त्यावेळेस तुम्हाला काहीच का सुचले नाही, असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला आहे.
वेदांत प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमुळे राज्याच्या बाहेर गेला असा आरोप विरोधक करत आहे. त्यावर गिरीश महाजन म्हणाले, आमचे सरकार येण्याच्या आधीच कंपनीची मनस्थिती अशी झाली होती की, आमचा प्रकल्प महाराष्ट्रात नको तर गुजरातला हवा आहे. वेदांत कंपनीने तत्कालीन सरकारला दिलेल्या पत्राची दखल सहा महिने सरकारने घेतली नाही, असेही ना. महाजन म्हणाले.