लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: इतर विद्यापीठाप्रमाणे पदवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट गुण देवून पास करण्यात यावी या मागणीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा समोर युवा सेनेच्यावतीने शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले. कुलगुरू व्ही.एल. माहेश्वरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. या सत्रात प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक प्रकारे त्रुटी आढळून आल्या, प्रश्नपत्रिकेच्या छपाईमध्ये घोळ, या त्रुटींबाबत विद्यार्थ्यांनी युवा सेनेमार्फत निवेदन दिले होते. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून याचे कोणतीही दखल घेण्यात आली नाही. यामुळे शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता युवा सेनेतर्फे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी विद्यार्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने त्यांच्या सर्व मागण्यांवर सोमवार १५ ऑगस्टपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वसन देण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात अक्षय गावंडे, रितेश कोळी, सोमनाथ पाटील, जगदीश पाटील, अल्ताफ आरिफ पिंजारी, आयुष कराडे, प्रशांत पाटील, दीपक पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.