मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता आणखी राजकीय रंग चढताना दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी गंभीर आरोप करत अशोक खरात हा सरकारशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नाना पटोले यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना म्हटले की, या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे अशोक खरात आणि त्याच्याशी संबंधित काही बडे राजकारणी व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. “दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत, मात्र सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणात आधीच मोठे राजकीय परिणाम दिसून आले आहेत. खरातशी संबंध आल्याच्या आरोपांमुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या विरोधातही पुढील चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय, या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह काही अन्य नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत एसआयटीने कोणत्याही नेत्याला चौकशीसाठी बोलावलेले नाही. तपासादरम्यान एसआयटीने शुक्रवारी अशोक खरातच्या कार्यालयाची पुन्हा झडती घेतली. या झडतीत काही महत्त्वाच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यात कथित औषधांच्या बाटल्या, कुजलेले पेढे, सॅनिटायझरच्या बाटल्या आदींचा समावेश आहे. तसेच कार्यालयाच्या दरवाजाच्या आतील भागावर खरातचे ठसे आढळल्याची माहिती समोर आली आहे.
तपास यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या वस्तूंचा वापर करून पीडित महिलांना मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आला असावा. जरी पीडितांच्या ठशांचे पुरावे कमी प्रमाणात मिळाले असले, तरी अन्य काही महत्त्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. हेच पुरावे पुढील न्यायप्रक्रियेत निर्णायक ठरू शकतात. दरम्यान, नाशिकसारख्या धार्मिक स्थळी घडलेल्या या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मानवता आणि कायद्याचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकरणात तातडीने आणि निष्पक्ष चौकशी होण्याची मागणी आता अधिक जोर धरत आहे.



