जालना : वृत्तसंस्था
जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर बुधवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 ते 6 जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात मृतकांमध्ये सर्व महिला असल्याचे समजते. अपघाताची जागा जालन्यातील कडवंची शिवारात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतक महिला कामगार होत्या, त्या भालगाव तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव येथील होत्या. समृद्धी महामार्गावर गवत काढण्याचे काम सुरू होते, तेव्हा महिला कामगार पिकअप व्हॅनमध्ये आल्या होत्या. जामवाडी शिवारात पिकअप व्हॅन थांबली असताना नागपूरहून येणाऱ्या भरधाव ट्रकने या पिकअपला धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की 7 महिलांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी महामार्गावर जेवणाचे डबे, चपला व इतर साहित्य आणि रक्त पसरलेले होते.
अपघातानंतर जखमींना स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले. जखमींची नावे अशी आहेत: प्रयागबाई बाबासाहेब वाघ (30), कविता विठ्ठल चौधरी (35), दिनेश रंगनाथ गायकवाड (42) आणि अज्ञात (50).
मृतकांचे नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- अल्काबाई दादाराव आदमाने (45, निधोना)
- लक्ष्मीबाई संतोष मदन (35, केळीगव्हाण)
- मीना परमेश्वर आदमाने (45, निधोना)
- कांचनबाई प्रकाश आदमाने (50, निधोना)
- ताराबाई गहेनाजी चौधरी (60, केळीगव्हाण)
- कडुबाई रामदास मदन (55, केळीगव्हाण)
- सुमनबाई कचरु आदमाने (70, निधोणा)
- मंगलबाई शिनगारे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून या दुर्घटनेची दखल घेतली असून, मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
समृद्धी महामार्गावर तीन वर्षांपूर्वीही 25 जणांचा मृत्यू झालेला भीषण अपघात घडला होता. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या लक्झरी बसने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा भागात पिंपळखुंटा गावाजवळ धडक घेतल्याने बस पलटी झाली होती आणि प्रवाशांचा मोठा जीवितहानी झाला होता. यामुळे या नवीन अपघातामुळे जुन्या जखमा पुन्हा उघडल्या आहेत आणि परिसरात शोककळा पसरली आहे.



