अकोला : वृत्तसंस्था
राज्यात सध्या सुरू असलेल्या तीव्र गॅस टंचाईचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले असून, अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू झाला. शंकरराव शिरसाट असे या मृत व्यक्तीचे नाव असून, ते गावाचे माजी सरपंच होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्वी मिर्झापूर येथील यदुराज गॅस एजन्सीवर गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कडाक्याच्या उन्हातही अनेक नागरिक तासन्तास रांगेत उभे होते. त्याच रांगेत शंकरराव शिरसाट हेही आपला क्रमांक येण्याची वाट पाहत उभे होते.
दरम्यान, उन्हाचा तीव्र तडाखा आणि दीर्घकाळ उभे राहिल्यामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जागीच कोसळले. उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
एका गॅस सिलिंडरसाठी माजी सरपंचाला जीव गमवावा लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गॅस वितरणातील अनियमितता आणि प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींमुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गॅस टंचाईची पूर्वकल्पना असूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, असा आरोप त्यांनी केला. योग्य नियोजन केले असते, तर हा जीव वाचू शकला असता, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या घटनेमुळे राज्यातील गॅस वितरण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



