सांगली : वृत्तसंस्था
आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे मानवी संवेदनांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या संशयावरून आई-वडिलांनी आपल्या दोन निष्पाप मुलींना रात्रभर उलटे टांगून ठेवल्यामुळे 10 वर्षीय सानिका हिचा मृत्यू झाला असून, तिची बहीण अनुजा हिची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना हैबत यमगर असे आरोपी वडिलांचे नाव आहे. शेजाऱ्याच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून त्यांनी आपल्या दोन मुलींना बुधवारी रात्री सुमारे 8 वाजता घरात उलटे टांगून ठेवले. निर्दयीपणे दिलेल्या या शिक्षेमुळे दोन्ही मुली रात्रभर वेदनेने तडफडत होत्या.
या दरम्यान, तहानेने व्याकुळ झालेल्या मुलींनी आई-वडिलांकडे पाण्याची याचना केली. “पाणी-पाणी” अशी आर्त हाक देत त्या मदतीसाठी ओरडत होत्या. मात्र, जन्मदात्या आई-वडिलांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मुलींचे आजी-आजोबा घराबाहेर झोपले होते. सकाळी सुमारे 6 वाजता आजोबांनी मुलींना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी वडिलांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर मुलींना खाली उतरवून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सानिकाला मृत घोषित करण्यात आले, तर अनुजावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर आरोपींनी आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करत सानिकाच्या मृतदेहावर गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न केला. मात्र, जखमी अनुजा शुद्धीवर आल्यानंतर तिने डॉक्टरांना संपूर्ण प्रकार सांगितल्याने या अमानुष कृत्याचा भांडाफोड झाला. डॉक्टरांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



