मुंबई : वृत्तसंस्था
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, “अशोक खरातसारखा अघोरी आणि विकृत माणूस पुन्हा कधीही जेलबाहेर येऊ नये, याची खात्री प्रशासनाने करावी,” असा इशारा त्यांनी दिला आहे. राजकीय हस्तक्षेप करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास गप्प बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दमानिया यांनी या प्रकरणामागे मोठे संगनमत असल्याचा आरोप करत म्हटले की, “हे सगळे काही एकटा माणूस करू शकत नाही. त्यामागे सहकारी आणि प्रभावशाली लोकांचा हात आहे.” त्यांनी राज्यातील विविध सरकारांवरही निशाणा साधत, मंदिरांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो; मात्र शाळा, रुग्णालये आणि मूलभूत सुविधांसाठी निधी दिला जात नाही, अशी टीका केली.
तसेच त्यांनी आरोप केला की, विविध राजकीय नेत्यांनी अशोक खरातच्या ट्रस्टला निधी दिला आणि त्यामुळेच तो अधिक प्रभावशाली बनला. “खरातला मोठे करण्यामागे लोकांसोबतच राजकारण्यांचाही हात आहे,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, प्रशासनातील अधिकाऱ्यांवरही त्यांनी गंभीर आरोप केले. उपायुक्त अभिजीत भांडे पाटील यांची केवळ बदली करून न्याय मिळणार नाही, असे सांगत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली. “या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आर्थिक व्यवहार तपासले गेले पाहिजेत,” असे त्या म्हणाल्या. राजकीय पातळीवरही त्यांनी टीका करत रुपाली चाकणकर यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता, असे म्हटले. तसेच सुनेत्रा पवार यांनी तो राजीनामा घ्यायला हवा होता, पण तसे झाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दमानिया यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणातील सर्व माहिती त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहेत. “या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या प्रकरणातील घडामोडींमुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



