एरंडोल : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका (कासोदा फाटा) येथे दि. २२ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत एरंडोल येथील प्रतिष्ठित शेतकरी तथा आरटीओ एजंट मंगेश शिवदास पाटील वय ६६, रा. पाटीलवाडा, एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी बोगद्या अभावी यापुर्वी अनेक अपघात झाले असून त्याच ठिकाणी आणखी एका निष्पापाचा बळी गेला आहे. त्यामुळे महामार्गावरील सुरक्षा आणि प्रस्तावित बोगद्याच्या प्रलंबित कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश पाटील हे रविवारी दुपारी आपल्या दुचाकीने (क्र.एम एच १९ डि एक्स १०९४) शेताकडे जात होते. अमळनेर – नाका परिसरातील कासोदा फाटा क्रॉसिंग – ओलांडत असताना जळगावकडून – धुळ्याच्या दिशेने अतिवेगाने जाणाऱ्या – एका कंटेनरने (क्र.डी. डी.०१ एस. ९१०३) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की मंगेश पाटील हे रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची भीषणता पाहून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. माणुसकीला काळिमा फासत, अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी कंटेनर चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. मात्र पोलिसांनी सदर कंटेनर चालकाला काही वेळातच ताब्यात घेतले आहे. मंगेश पाटील हे एरंडोल येथील एक सन्माननीय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पाटीलवाडा परिसरासह संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला असून त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि बोगद्याच्या अभावामुळे आज एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवण्यात आली असून कंटेनर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील
करीत आहेत.



