मुंबई : वृत्तसंस्था
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कालीचरण महाराज यांनी केलेले विधान चर्चेचा विषय बनले आहे. अशोक खरातला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या चौकशीसाठी एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणात त्याचे विकृत स्वरूप, महिलांचे लैंगिक शोषण, व्हिडीओ पुरावे आणि त्याच्या नावावर असलेली बेनाम संपत्ती समोर आली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची मागणी केली जात आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना कालीचरण महाराज म्हणाले की, धर्माच्या नावावर पैसे घेणे चुकीचे नाही, परंतु लोकांना ठगणे किंवा कूकर्म करणे हा गुन्हा आहे. “जो लोक कूकर्म करतो, तो नरकात जाईल आणि शासकीय दंडही मिळेल,” असे ते म्हणाले.
महाराज पुढे म्हणाले, “स्वयंघोषित महाराज किंवा साधू जर दुरुपयोग करत आहेत, कूकर्म करीत आहेत किंवा धर्म कलंकित करीत आहेत, तर हे लोक महापापी आहेत. जेव्हा त्यांच्या गुन्ह्यांची सिद्धता होते, तेव्हा त्यांना भर चौकात गोळी मारली पाहिजे.”
कालीचरण महाराजांनी असेही स्पष्ट केले की, राजांनाही अशा साधूंवर विश्वास ठेवण्याची इच्छा असते कारण त्यांच्या मागे मोठा जनसमुदाय असतो आणि त्यांच्या शिष्य मतदानात प्रभाव टाकतात. मात्र, जर साधू भ्रष्ट निघाला, तर राजाही त्याच्याकडे ढुंकून पाहत नाही.
महाराजांच्या विधानामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळांतून मोठ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. अशा विधानांनी लोकांमध्ये न्याय आणि कडक कारवाईबाबत चर्चा तिव्र केली आहे, तसेच धर्माच्या नावावर होणाऱ्या दुरुपयोगावरही लक्ष वेधले आहे.



