जळगाव : प्रतिनिधी
वडिलांना मारहाण केल्याच्या संतापातून तिघांवर गावठी कट्ट्यातून दोन राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना शहरातील वाल्मिक नगर परिसरातील घरकुल चौकात मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र शनिपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयित अनिल रसाल राठोड (रा. श्रीराम चौक, वाल्मिक नगर) याला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक नगरातील श्रीराम चौकात राहणारे रसाल राठोड (वय ४८) हे नेरीनाका स्मशानभूमीकडून जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी त्यांना मारहाण केली होती. या घटनेची माहिती मुलगा अनिल राठोड याला मिळाल्यानंतर तो संतापाच्या भरात घरातून बाहेर पडला.
दरम्यान, वडिलांना मारहाण करणारे तिघे जण वाल्मिक नगरातील घरकुल चौकात बसलेले असल्याचे अनिल राठोड याला दिसले. त्याने दुचाकी वळवून त्यांच्याकडे जात कमरेला लावलेल्या गावठी कट्ट्यातून त्यांच्या दिशेने दोन राऊंड फायर केले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश जाधव, अमोल वंजारी, पराग दुसाने, निलेश घुगे व नवजीत चौधरी यांच्या पथकाने संशयिताचा शोध घेतला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अनिल राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. या घटनेप्रकरणी पुढील तपास शनिपेठ पोलीस करीत असून शहरात पुन्हा एकदा गावठी कट्ट्याच्या वापरामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



