छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगर–धुळे महामार्गावर बुधवारी दुपारी एक भीषण घटना घडली. शहादा डेपोची शहादा–संभाजीनगर एसटी बस पळसवाडी शिवारातील हॉटेल आम्रपाली समोर थांबलेली असताना अचानक पेट घेतला. सुदैवाने सर्व प्रवासी जेवणासाठी खाली उतरलेले असल्याने ५० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला, मात्र काही मिनिटांतच संपूर्ण बस जळून खाक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही बस शहादा येथून संभाजीनगरकडे प्रवाशांना घेऊन जात होती. दुपारी सुमारे ४ वाजता चालक व वाहकाने पळसवाडी येथे जेवणासाठी बस थांबवली. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही वेळातच बसच्या इंजिनमधून धूर निघू लागला आणि पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले.
प्राथमिक माहितीनुसार, बस दीर्घकाळ सतत धावत असल्यामुळे इंजिन ओव्हरहीट होऊन शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही मिनिटांतच आगीने संपूर्ण बसला वेढा घातला आणि बसचा अक्षरशः सांगाडा उरला.
बस थांबलेली असतानाच हा प्रकार घडल्याने चालक व वाहकाने प्रवाशांना तात्काळ सुरक्षित अंतरावर हलवले. मात्र, बस पूर्णपणे जळाल्याने काही प्रवाशांचे सामान व महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भर उन्हात सुमारे ५० प्रवासी महामार्गावर अडकून पडल्याने त्यांचे मोठे हाल झाले.
घटनेदरम्यान आग विझवण्यासाठी बसमधील फायर एक्स्टिंग्विशर वापरण्याचा प्रयत्न केला असता तो रिकामा असल्याचे समोर आले. आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणारी ही सुरक्षा व्यवस्था निकामी असल्याने एसटी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आग इतकी भीषण होती की स्थानिक नागरिक आणि हॉटेलवरील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्वाळांच्या तीव्रतेमुळे त्यांना यश आले नाही. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तांत्रिक बिघाड तसेच सुरक्षेच्या साधनांच्या अभावाबाबत सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. मात्र, ५० प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या प्रकारावर नेमकी काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



