मुंबई : वृत्तसंस्था
इयत्ता दहावी व बारावीच्या यंदाच्या बोर्ड परीक्षांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणेमुळे मास कॉपीचे प्रकार उघडकीस आले असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण 81 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित केंद्रांवरील गैरप्रकारांचे पुरावे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून समोर आल्यानंतर राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला-विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात (केंद्र क्रमांक 224) सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. प्रशासनाने या प्रकरणी 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले. विशेष म्हणजे, हा प्रकार परीक्षेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारीला घडल्याचे समोर आले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर (केंद्र क्रमांक 0079) येथेही मास कॉपीचा प्रकार घडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये केंद्र संचालक व पर्यवेक्षक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचे आढळले. या प्रकरणात 24 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून 21 जणांना निलंबित करण्यात आले.
तसेच जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रांवर इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. संबंधित विद्यार्थ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली असून पर्यवेक्षक म्हणून नियुक्त पाच शिक्षकांवरही कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये मायक्रोनोट्स तसेच ‘चॅट जीपीटी’चे प्रिंटआउट वापरून सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी तीन शिक्षक आणि एका शिपायावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या म्हणण्यानुसार, यंदा अनेक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आल्यामुळे गैरप्रकारांचे स्पष्ट पुरावे मिळत आहेत. त्यामुळे कॉपी रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात असून दोषींवर तातडीने कारवाई केली जात आहे.



