भडगाव : प्रतिनिधी
दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या दोघांच्या बलिदानाने रविवारी संपूर्ण भडगाव तालुका सुन्न झाला. गिरणा नदीपात्रात बुडणाऱ्या लहान मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने पाण्यात उतरलेल्या नदीम खान नसीम खान (वय २७) आणि काफिया शरीफ पिंजारी (वय १६) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली असून, अवैध वाळू उपशामुळे झालेल्या खड्ड्यांनी या निष्पाप जीवांचा बळी घेतल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि, रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात काही लहान मुले पाण्यात वाहतांना दिसून आली. जवळच काफिया कपडे धुत होती. त्यांना वाचवण्यासाठी काफीयाने नदीत उडी घेतली. तिला पाण्याचा अंदाज न लागल्याने ती देखिल बुडू लागली. दरम्यान नदीमला ही माहिती मिळताच तो धावत येऊन जीवाची पर्वा न करता त्यानेही नदीत उडी घेतली. तसेच बुडणाऱ्या मुलांना त्याने पाण्याबाहेर काढले मात्र, बुडणाऱ्या युवतीला वाचविण्याच्या प्रयत्नात नदीमला स्वतः जीव गमवावा लागला. नदीपात्रात असलेल्या खोल खड्ड्यांमुळे नदीम व काफिया या दोघांना बाहेर निघता आले नाही, दुर्दैवाने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
लहान बालकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या युवक युवतीचा मृत्यू झाल्यामुळे भडगाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वांच्या मनाला चटका लावून जाणाऱ्या घटनेनंतर भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून वाळू माफियांवर कारवाई होणार का? प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
घटनेची माहिती मिळताच आ. किशोर पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच प्रदी मलचे, नगरसेवक आसिम मिर्झा, अलीम शाह आणि डॉ. विजयकुमार देशमुख यांनीही या कठीण प्रसंगात धीर दिला. तर गटनेत लखिचंद पाटील यांनी तात्काळ रुग्णवाहीका उपलब्ध करुन दिली.
यादुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. ‘रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने जो अवैध वाळू उपसा होतो, त्यामुळे नदीपात्रात धोकादायक खोल खड्डे तयार झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे आज दोन तरुण तरुणीला जीव गमवावे लागले, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने वाळू माफियांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल, नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी व पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक महेश शर्मा, महसूल विभागाचे तलाठी अविनाश जंजाडे आणि प्रशांत कुंभारे, राजू अहिरे, इकबाल शेख, नगरसेवक इमरान अली सय्यद यांनी तातडीने यंत्रणा हलवल्या. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून विशेष पथक पाठविले. नगरपरीषदेचे छोटु वैद्य, अजय कंडारे, नितीन पारचे, सदीप पाटील आणि पाचोरा येथील गोताखोर हुसेन यांनी शोधमोहिम राबवली.



