मुंबई : वृत्तसंस्था
युद्धजन्य परिस्थिती आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत सुरू असलेल्या राजकीय वादात भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, “युद्धाच्या काळात भारताने काय भूमिका घ्यावी, यासाठी केंद्रीय पातळीवर नेते आणि अधिकारी बैठकीत बसले आहेत. राऊतांनी त्यात नाक खुपसण्याची गरज नाही. देशाची मान खाली जाणार नाही. भारत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सक्षमपणे पुढे जात आहे.”
नवनाथ बन यांनी राऊतांच्या वक्तव्यावर थेट निशाणा साधत म्हटले की, “राऊतांकडून आपल्याच देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला जात आहे. देशात राहून परदेशी नेत्यांचे गुणगान गायले जात आहे. पंतप्रधान मोदींचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान होतो. 140 कोटी भारतीयांनी पंतप्रधानांचे नेतृत्व पाहिले आहे; त्यांनी त्यावर विश्वास ठेवला आहे.”
भारत-अमेरिका संबंधांबाबत बोलताना नवनाथ बन यांनी स्पष्ट केले की, “भारत अमेरिकेचा गुलाम नाही. दोन्ही देशांमधील करारांमुळे आपल्यावरील टॅरिफ कमी झाला आहे. राऊत हे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे गुलाम झाले आहेत. काँग्रेसचे दलाल देशातील राजकारणावर आपले मत लावत आहेत. गुलामांनी इतरांबाबत आरोप करू नये.”
आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत बन यांनी स्पष्ट केले की, “भारतीयांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम यंत्रणा करत आहे. राऊतांनी त्यांची चिंता करण्याची गरज नाही. ते स्वतःच्या पक्षातील स्थितीची चिंता करावीत. आपल्याला आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांना भारतात सुरक्षित आणण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे देशाची चिंता राऊतांनी करू नये.”
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून बन यांनी राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे. “राऊतांनी सात दिवसांत माफी मागावी; अन्यथा या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल. सोमय्या, भुसे यांच्या प्रकरणांमध्ये देखील न्यायालयात जाऊन माफी मागावी लागली होती. राऊतांनी काल नशेत केलेले आरोप त्वरित माफ करावेत,” असे त्यांनी सांगितले.
राज्यातील या राजकीय वादामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. नवनाथ बन यांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर शांततेचे वातावरण राखण्याचे आवाहन केले, तसेच केंद्र सरकारच्या धोरणावर विश्वास ठेवण्याचे आणि 140 कोटी जनतेच्या इच्छेनुसार भारत सुरक्षितपणे पुढे चालत असल्याचेही सांगितले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे, आणि आगामी दिवसांत राजकीय टीका-टिप्पणी अधिक तीव्र होऊ शकते.



