जळगाव : प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव जिल्हयाच्या वतीने आज “विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा” काढण्यात आला होता. शिवतीर्थ मैदान येथून प्रारंभ झालेला मोर्चा विविध घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर शासनाने सातत्याने केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
मोर्चामध्ये जिल्ह्यातील विविध कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालये, आयटीआय, अभियांत्रिकी व तांत्रिक संस्था, वैद्यकीय, नर्सिंग, कृषी तसेच आयुर्वेदिक शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. “शिक्षण आमच्या हक्काचं -नाही कोणाच्या बापाचं”“शिष्यवृत्ती तात्काळ द्या”, “विद्यार्थ्यांवर अन्याय चालणार नाही”,अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
* स्पर्धा परीक्षा शुल्क माफः अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा शुल्क माफी करावी. ऑनलाइन परीक्षांसाठी भरमसाठ शुल्क आकारले जात असल्याने ते तात्काळ कमी करावे.
* मुलींचे मोफत शिक्षणः ही योजना सर्व स्तरांवर अंमलात आणावी. शासन परिपत्रकानुसार पूर्ण शुल्क माफ करावे; फक्त ट्युशन फी माफ करून विद्यार्थिनींना संभ्रमित करु नये.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेः प्रवेश, परीक्षा व निकालसंबंधित समस्या सोडवाव्यात. विद्यार्थ्यांचे मानसिक-आर्थिक छळ थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात व संलग्न महाविद्यालयांना अन्य विद्यापीठात वर्ग करण्याची मुभा द्यावी.
* प्रलंबित शिष्यवृत्ती: डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता, पंडित दीनदयाल उपाद्याय निर्वाह भत्ता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना इत्यादी व अन्य शिष्यवृत्ती तात्काळ खात्यांमध्ये वर्ग कराव्यात.
* आयटीआय भत्ताः आयटीआय विद्यार्थ्यांचा भत्ता वेळेवर खात्यांमध्ये जमा करावा.
* महाविद्यालयीन खुल्या निवडणुका: बंद असलेल्या निवडणुका महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 नुसार आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरु कराव्यात. सामान्य कुटुंबातील तरुणांना नेतृत्वाची संधी मिळेल.
* वसतिगृह सुधारणाः सर्व जीर्ण शासकीय वसतिगृह नूतनीकरण करावेत, खाणावळ व्यवस्था सुधारावी व निकृष्ट भोजन थांबवावे.
* आयटीआय सुविधाः प्रात्यक्षिक उपकरणे अद्ययावत करावीत, जीर्ण इमारती कोसळण्याच्या अवस्थेत असल्याने नवीन बांधकाम करावे.
* नर्सिंग महाविद्यालय: नोकरीसाठी 80:20 पॅटर्न अन्यायकारक असल्याने सर्वांना समान संधी द्यावी.
* कृषी व अकृषी विद्यापीठ: प्राध्यापक व कर्मचारी रिक्त पदे तात्काळ भरावीत.
* शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयः सुरू होऊन ४ वर्षे झाली तरी गुलाबराव देवकर महाविद्यालयाच्या इमारतीत वर्ग भरवले जात आहेत. तरतूद झालेल्या जागेमध्ये अद्यावत व सुसज्ज इमारतीचे बांधकाम व वसतिगृह त्वरित पूर्ण करावे.
* इंटर्न व रेसिडेंट डॉक्टर्स: रुग्णसेवा, रात्रपाळ्या व ताणामुळे अत्यल्प स्टायपेंड मिळत असल्याने ते वाढवावे.
मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. सदर निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री,कौशल्य विकास मंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आले असून तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ औपचारिक आश्वासनांवर समाधान न मानता ठोस व वेळबद्ध निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली.
समारोप प्रसंगी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे म्हणाले की,“शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुय्यम दृष्टीकोन ठेवणे अत्यंत चिंताजनक आहे.विद्यार्थिनीचे मोफत शिक्षण, प्रलंबित शिष्यवृत्ती आणि प्रशासनातील दिरंगाईमुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहे.आजचा मोर्चा हा केवळ निषेध नसून इशारा आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड स्वीकारली जाणार नाही. शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर अभाविप संघर्ष अधिक तीव्र करून जिल्हास्तरावरून राज्यव्यापी आंदोलन उभारेल.”
यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे,प्रदेश कार्यसमिती सदस्य कु.गायत्री पाटील, जिल्हा संयोजक तेजस पाटील, महानगर सहमंत्री वरद पांढारकर व शारदा पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले तसेच जिल्ह्यातील शहरमंत्री ,महाविद्यालयाचे अध्यक्ष-मंत्री व विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते व सामान्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



