मुंबई : वृत्तसंस्था
राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील चेंबूर परिसरात शनिवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. चेंबूरच्या सुभाष नगर भागातील एका निर्माणाधीन आलिशान इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून सहा कामगार सुमारे ८० ते ९० फूट उंचीवरून खाली कोसळले. या अपघातात एका ५५ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे १२.०५ वाजण्याच्या सुमारास कामगार नेहमीप्रमाणे बांधकामाचे काम करत होते. अचानक तोल जाऊन सहा जण खाली कोसळले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. इतर कामगार आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कामगारांना तातडीने राजावाडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रामाल्लू (५५) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. २२ वर्षीय गुनाधर राय याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उसराई (३०), रमेश राय (२५), विजय (३५) आणि संदीप (२७) यांच्यावरही उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे एवढ्या उंचीवर काम करत असतानाही कामगारांनी सेफ्टी किटचा वापर केला नव्हता. नियमानुसार उंच इमारतींवर काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आणि संरक्षक जाळी (सेफ्टी नेट) अनिवार्य असते. मात्र प्राथमिक तपासात सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. कामगारांनी सेफ्टी बेल्ट लावले असते तर ही दुर्घटना टळली असती, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.



