बीड : वृत्तसंस्था
बीड तालुक्यातील कुर्ला येथील यशवंत विद्यालयात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नियोजनाच्या अभावामुळे गोंधळ उडाला. वर्गखोल्या अपुऱ्या पडल्याने तब्बल १०० विद्यार्थ्यांना शाळेच्या गच्चीवर उभारलेल्या मंडपात बसून परीक्षा द्यावी लागली. या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शिक्षण विभागाने केंद्र संचालकाच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत विद्यालयात एकूण १२ वर्गखोल्या आहेत. मात्र यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने उपलब्ध खोल्या अपुऱ्या ठरल्या. ही बाब शाळा प्रशासनाच्या गुरुवारी रात्री लक्षात आली. त्यानंतर घाईगडबडीत शाळेच्या गच्चीवर मंडप उभारून चार तात्पुरते हॉल तयार करण्यात आले. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी १०० विद्यार्थ्यांनी या मंडपात बसून प्रश्नपत्रिका सोडवली. उन्हाची तीव्रता, वारा आणि इतर असुविधांमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याची चर्चा होती. पालकांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, शाळा प्रशासनाने विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा केला. मात्र, गतवर्षीपेक्षा केवळ १७ विद्यार्थी अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नियोजनातील त्रुटीमुळेच ही वेळ आल्याची चर्चा रंगली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने दखल घेतली. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी संबंधित केंद्र संचालकावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगितले. तसेच पुढील वर्षी हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या १०० विद्यार्थ्यांची व्यवस्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार वर्गखोल्यांमध्ये करण्यात येणार असून उर्वरित पेपर सुरळीत पार पाडण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेबाबत प्रशासनाने अधिक जबाबदारीने नियोजन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.



