मुंबई : वृत्तसंस्था
अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत मनातील भावना व्यक्त केल्या. “आज एकीकडे आनंद आहे, तर दुसरीकडे प्रचंड दु:ख आहे. दादांचं वय जाण्याचं नव्हतं. ते आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही,” अशा शब्दांत त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली.
सुळे यांनी सांगितले की, शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर आणि चांगली आहे. रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले. “घरात एका डोळ्यात आनंद आहे, तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत,” असे म्हणत त्यांनी कुटुंबातील भावनिक स्थिती स्पष्ट केली. अजित पवार यांच्या आठवणी अजूनही ताज्या असून त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव प्रत्येक क्षणी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
रोहित पवार यांनी १२ तारखेला काही खुलासे करणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, सुळे यांनी संयत भूमिका घेतली. “दादा राहिले नाहीत, कुणाबद्दल जुनं काय काढायचं?” असे त्या म्हणाल्या. रोहितची अस्वस्थता स्वाभाविक असल्याचे सांगत, कुटुंब सध्या कठीण काळातून जात असून एकमेकांना आधार देत पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी पहिली सविस्तर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल व पारदर्शक चौकशीचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. “चौकशीची वाट पाहणे योग्य ठरेल,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
रेवतीच्या लग्नाबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, हे लग्न अजित पवार जिवंत असतानाच त्यांच्या आशीर्वादाने ठरले होते. “दादा असते तर या लग्नाची घोषणा त्यांनीच केली असती,” असे त्या म्हणाल्या. पुढील निर्णय दादांच्या इच्छेनुसार आणि आशीर्वादानेच घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दु:ख आणि आनंद अशा मिश्र भावनांमध्ये पवार कुटुंब पुढे जात असल्याचे सुप्रिया सुळे यांच्या शब्दांतून स्पष्ट झाले.



