मुंबई : वृत्तसंस्था
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचा पराभव हा त्यांच्या नकारात्मक प्रचाराचा परिणाम असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीला राज्यभर मोठे यश मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सोमवारी पार पडली. या निकालांमध्ये सत्ताधारी महायुतीने बहुतांश जागांवर विजय मिळवला असून, विरोधी महाविकास आघाडीची पराभवाची मालिका कायम राहिली आहे.
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “आम्ही निवडणूक प्रचारादरम्यान ग्रामीण जनतेपुढे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकारच्या विकास योजनांचा लेखाजोखा मांडला. महाराष्ट्राने विकासाला मत दिले आहे. टीकाटिप्पणी व नकारात्मक बोलण्याला आता जनता मतदान करत नाही.”
ते पुढे म्हणाले की, पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले असले तरी तो जिल्हा अजित पवार यांच्याच पाठिशी असल्याने ही मते पर्यायाने महायुतीलाच मिळाली आहेत. आगामी काळात काही ठिकाणी अजित पवार गटाचे, काही ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे तर अनेक ठिकाणी भाजपचे अध्यक्ष असतील; मात्र राज्यभर महायुतीचेच चित्र दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या पराभवाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, “काँग्रेसने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नकारात्मक प्रचार केला. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. शरद पवार यांचे मार्गदर्शन अपुरे ठरले असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. काँग्रेसकडे कोणतेही व्हिजन नाही. जिथे व्हिजन नाही, तिथे जनता नसते; आणि जिथे व्हिजन आहे, तिथेच लोकांचा पाठिंबा असतो.”



