महानगरपालिकेवर गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासक राज सुरू असल्याने शहरातील विविध प्रभागांमधील नागरी प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून प्रभाग क्र. १३ मधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी प्रभागातील वाढत्या नागरी समस्यांबाबत महापौरांकडे लेखी निवेदन सादर करत तातडीची संयुक्त बैठक बोलावण्याची ठाम मागणी केली आहे.
निवेदनात नगरसेविका पाटील यांनी प्रभागातील स्वच्छता व्यवस्थेची बिकट अवस्था स्पष्टपणे मांडली आहे. सफाई कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, घंटागाड्यांची कमतरता तसेच आवश्यक वाहने उपलब्ध नसल्यामुळे कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अनेक भागांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आजारांचा धोका वाढत आहे.
यासोबतच प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, तुंबलेल्या गटारी, दुर्लक्षित ओपन स्पेस, रखडलेली सुशोभिकरणाची कामे तसेच इतर अत्यावश्यक नागरी सुविधा वेळेवर न मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. काही विकासकामे मंजुरीअभावी रखडली आहेत, तर काही सुरू असलेली कामे विविध अडचणींमुळे अर्धवट अवस्थेत असल्याचे वास्तव त्यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले.
प्रभागातील प्रलंबित व नवीन विकासकामांना गती देण्यासाठी महापौर, उपमहापौर व आयुक्त यांच्या स्तरावर सविस्तर आणि निर्णायक चर्चा होणे अत्यावश्यक असल्याचे नगरसेविका पाटील यांनी सांगितले. यासाठी प्रभागातील नगरसेवक नितीन प्रभाकर सपके, सौ. सुरेखा नितीन तायडे व प्रफुल्ल गुलाबराव देवकर, तसेच संबंधित महापालिका अधिकारी आणि कामांचे मक्तेदार यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक आयोजित करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
ही बैठक लवकरात लवकर झाल्यास प्रभाग क्र. १३ मधील रखडलेली कामे मार्गी लागतील आणि नवीन विकासकामांना गती मिळेल. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर होऊन प्रभागाचा समतोल विकास साधता येईल, असा विश्वास नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी व्यक्त केला आहे.



