मुंबई : वृत्तसंस्था
संजय राऊत यांना ‘विश्वास’ हा शब्द उच्चारण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, कारण त्यांनी उभ्या हयातीत कुणावरही विश्वास ठेवलेला नाही. विश्वासघात करणे हा उबाठा आणि संजय राऊत यांचा डीएनए आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांसह उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.
नवनाथ बन म्हणाले की, शरद पवार यांना सोबत घ्यायचे की नाही, हा निर्णय देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा भाजप ठरवणार नाही. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार आणि त्यांच्या नेतृत्वाकडून घेतला जाईल. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पद सध्या त्यांच्याकडे असून, त्या योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राऊतांना दोन भावांचे विलीनीकरण करता आले नाही, दोन भावांना एकत्र ठेवता आले नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर बोलू नये, असा टोला नवनाथ बन यांनी लगावला.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण हा पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे संजय राऊत सांगत आहेत. हेच आम्ही पहिल्यापासून सांगत होतो, मात्र आता उशिरा का होईना राऊतांना ते समजले आहे. शरद पवार एनडीएमध्ये जातील या भीतीपोटीच राऊत अशी विधाने करत असल्याचा आरोपही नवनाथ बन यांनी केला. सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल. दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मविआच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नवनाथ बन म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीतच मविआ फुटली होती. आता मविआमध्ये काँग्रेस, शरद पवारांचा पक्ष किंवा उद्धव ठाकरे आहेत का, हा प्रश्न आहे. मनपा निवडणुकांमध्ये मविआ औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. जनतेने त्यांना नाकारले असून, येणाऱ्या काळात मविआ अस्तित्वात राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. अजित पवारांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. तो विश्वासापोटीच अजित पवार फडणवीसांसोबत गेले. सकाळचा शपथविधीही त्याच विश्वासातून झाला होता. त्यामुळे राऊतांनी ‘विश्वास’ या शब्दाचा वापर करू नये, असा घणाघात करत नवनाथ बन यांनी टीका समाप्त केली.



