मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार यांच्या अपघाती विमान दुर्घटनेनंतर तपास यंत्रणांनी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश केला आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जाणारा ब्लॅक बॉक्स अखेर तांत्रिक तपासासाठी सक्रिय करण्यात आला असून, त्यातील माहिती रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे अपघाताच्या नेमक्या कारणांबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता वाढली आहे.
विमान अपघातानंतर घटनास्थळावरून मिळालेल्या अवशेषांमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित अवस्थेत आढळून आला होता. मात्र, त्यातील डेटा उघडणे ही अत्यंत संवेदनशील व तांत्रिक प्रक्रिया असल्याने ती विशेष तज्ञांच्या देखरेखीखाली राबवली जात आहे. ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यानची तांत्रिक माहिती, इंजिनची स्थिती, पायलट आणि कंट्रोल रूममधील संवाद, तसेच शेवटच्या क्षणांतील हालचालींच्या नोंदी साठवलेल्या असतात. त्यामुळे या माहितीचे विश्लेषण अपघाताच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवला असून, केंद्र सरकारच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडे ब्लॅक बॉक्स जप्त आहे. या डेटच्या आधारे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, दोषी आढळणाऱ्या घटकांवर कडक कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ब्लॅक बॉक्समधील माहिती सुरक्षित असल्याची प्राथमिक खात्री झाल्यानंतरच रिकव्हरी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया विशेष प्रयोगशाळेत उच्च तांत्रिक साधनांच्या साहाय्याने पार पाडली जात असून, कोणतीही माहिती नष्ट होऊ नये यासाठी प्रत्येक टप्प्यावर अत्यंत काळजी घेतली जात आहे. तज्ञांची विशेष टीम या कामात गुंतलेली आहे.
या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. अजित पवार यांच्यासह विमानातील अन्य प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर अपघाताच्या कारणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. हवामानातील बदल, तांत्रिक बिघाड, लँडिंगदरम्यान अडचण आदी शक्यतांवर चर्चा सुरू होती. मात्र, ब्लॅक बॉक्समधील अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या सर्व बाबींवर शास्त्रीय निष्कर्ष निघणार आहेत.
ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणानंतर तपास यंत्रणांकडून सविस्तर अहवाल तयार केला जाणार असून, त्याच्या आधारे पुढील कायदेशीर व तांत्रिक निर्णय घेतले जातील. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना ठरवण्यासाठीही हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्ते आणि नागरिकांना अपघाताचे खरे कारण समजावे, अशी अपेक्षा आहे. ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरी सुरू झाल्याने तपासाला नवे वळण मिळाले असून, अधिकृत निष्कर्ष जाहीर झाल्यानंतरच अपघातामागचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.



