चंद्रपूर : वृत्तसंस्था
चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याठिकाणी भाजप आणि ठाकरेसेना एकत्र येऊ शकतात, असे संकेत ठाकरेसेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहेत.
संदीप गिऱ्हे म्हणाले की, ठाकरेसेनेची स्वाभाविक आघाडी काँग्रेससोबत असली तरी काँग्रेसच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. “काँग्रेसला खरंच आम्हाला सोबत घ्यायचे आहे का, असा प्रश्न त्यांच्या वागणुकीतून निर्माण झाला आहे,” असे त्यांनी सांगितले.
गिऱ्हे यांनी स्पष्ट केले की, ठाकरेसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या आठ नगरसेवकांनी संयुक्त गट नोंदवला असून, आणखी दोन नगरसेवक आमच्या पाठिंब्याने आहेत. त्यामुळे ठाकरेसेनेचा महापौर करण्यास जो पक्ष तयार असेल, त्यांना आमच्या दहा नगरसेवकांचा पाठिंबा दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौर निवडीसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून संपर्क करण्यात आला असल्याची माहिती गिऱ्हे यांनी दिली. काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा झाली असली तरी धानोरकर गटाकडून अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
“निवडणुकीपूर्वीही आम्ही काँग्रेसशी संपर्क साधला होता. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना निवडणुकीपूर्वी आमची गरज नव्हती, मग निवडणुकीनंतर खरंच गरज आहे का, हा प्रश्न आमच्यासमोर आहे,” असे गिऱ्हे म्हणाले. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला आहे, असे ठाकरेसेनेचे मत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपसोबत काय निर्णय होऊ शकतो, याबाबत एक ते दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सूचित केले.
दरम्यान, जर काँग्रेसने ठाकरेसेनेला महापौरपद देण्याची अधिकृत घोषणा केली, तर काँग्रेससोबत जाण्यास आमची तयारी आहे. मात्र सध्या काँग्रेस अंतर्गत गटातटाच्या राजकारणात अडकलेली असल्याचा आरोपही संदीप गिऱ्हे यांनी केला.



