मुंबई : वृत्तसंस्था
भाजप आपल्याच नगरसेवकांवर पाळत ठेवून त्यांचे फोन टॅप करत असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही बोचरी टीका केली.
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे ब्लॅकमेल करून स्थायी समिती पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. “त्यांना महापौरपदापेक्षा स्थायी समितीतच जास्त रस आहे. जिथे पैशांचे व्यवहार, ठेकेदारीचे घोटाळे होतात, तिथेच या लोकांचा ओढा असतो,” असा आरोप त्यांनी केला.
मुंबई महापौरपदाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, भाजपच्या दिल्ली हायकमांडकडून देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत महापौरपदावरचा दावा सोडू नका, असा आदेश देण्यात आला आहे. “भाजपचा महापौरपदावरील दावा सुटणार नाही. पण ब्लॅकमेल करून काही दुसरे पद पदरात पाडून घेता येईल का, असा शिंदेंचा विचार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने हॉटेल पॉलिटिक्स सुरू केल्याचा आरोप करत संजय राऊत म्हणाले की, भाजपने त्यांच्या नगरसेवकांना पुढील दहा दिवस मुंबई न सोडण्याचे फर्मान काढले आहे. “भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर वॉचडॉग ठेवण्यात आले आहेत. ते घरी असले, तरी त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. भाजपचे नगरसेवक तसेच हॉटेलमध्ये असलेल्या शिंदेंच्या नगरसेवकांचे फोन टॅप केले जात आहेत,” असा गंभीर दावा त्यांनी केला. “रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे. भाजप स्वतःच्या नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे,” असेही राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. “दावोस येथे गुंतवणुकीवर चर्चा कमी होत असून, मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्यात मुंबईच्या महापौरपदावरच जास्त चर्चा सुरू आहे. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात गुंतवणूक कमी येईल. सगळ्यांची गुंतवणूक मुंबई महापालिकेच्या महापौरपदाभोवती फिरत आहे,” असा आरोप राऊत यांनी केला. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापले असून, भाजप व शिंदे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



