मुंबई : वृत्तसंस्था
नगरपालिका निवडणुकांमध्ये एका कुटुंबातील अनेक सदस्यांना संधी देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकांसाठी मात्र आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे. “पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा,” या उद्देशाने विद्यमान आमदार, खासदार व मंत्र्यांच्या पत्नी किंवा मुलांना उमेदवारी न देण्याचा धोरणात्मक निर्णय भाजपने घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत आज स्पष्टपणे दिसून आली.
मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपच्या या नव्या धोरणामुळे आज अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी राज्यातील अनेक आमदार व खासदारांच्या मुलांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
नाशिकमध्ये भाजपच्या दोन आक्रमक महिला आमदारांच्या कुटुंबीयांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलाने भरलेला अर्ज पक्ष धोरणानुसार मागे घेण्यात आला. “या निर्णयामुळे सामान्य कार्यकर्त्यांना बळ मिळेल,” अशी प्रतिक्रिया फरांदे यांनी दिली. तसेच आमदार सीमा हिरे यांच्या मुलीनेही नाशिक महापालिका निवडणुकीतून आपले नाव मागे घेतले आहे.
कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सुरुवातीला वरिष्ठांच्या परवानगीने अर्ज भरला होता; मात्र राज्य पातळीवर ‘घरातील व्यक्तींना उमेदवारी नाही’ हा नियम निश्चित झाल्यानंतर त्यांनी तत्काळ माघार घेतली. “आम्ही पक्षाचे आदेश पाळणारे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत,” असे महाडिक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपच्या या कडक नियमावलीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कुटुंब अपवाद ठरल्याची चर्चा आहे. नार्वेकर यांच्या भावाला व वहिनीला उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
तिकीट न मिळाल्याने अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून, त्यांची समजूत काढण्याचे पक्षासमोर मोठे आव्हान आहे. यासंदर्भात खासदार धनंजय महाडिक म्हणाले, “महायुतीची सांगड घालताना काही ठिकाणी अन्याय झाला असेल, मात्र दोन दिवसांत सर्व नाराजांची समजूत काढली जाईल. आमची उमेदवार यादी आता अंतिम झाली आहे,” असेही त्यांनी सांगितले.



