सांगोला : वृत्तसंस्था
शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोल्यात झालेल्या सभेत वादग्रस्त वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शिवसेनेला मतदान करणारे थेट स्वर्गात जाणार असल्याचे विधान त्यांनी यावेळी केले. “ज्यांनी धनुष्यबाणाचे बटन दाबले, त्यांना स्वर्गातच जागा आहे,” असेही पाटील म्हणाले.
सभेत बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, “मी खात्रीने सांगतो, ज्यांनी धनुष्यबाण दाबले त्यांना स्वर्गातच जागा आहे. देव त्यांना नरकात जाऊ देत नाही. मात्र, ज्यांनी विरोधकांची बटणे दाबली, त्यांच्यात राम उरलेला नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
यावेळी त्यांनी विधानसभेतील पराभवावरून माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावरही निशाणा साधला. “मी भाकरीत साप पाळला, म्हणूनच मला विधानसभेत पराभवाचा फटका बसला,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे साळुंखेंवर आरोप केले. आपण आजही महायुतीत असून युतीचेच काम करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पाटलांनी भाजपलाही सूचक इशारा दिला. “हा मतदारसंघ २०१४ पासून शिवसेनेचा आहे. तुम्ही आमचा सन्मान ठेवाल, तर आम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. मात्र, तसे झाले नाही तर आम्ही पुन्हा एकट्या वाटेने जाऊ,” असे ते म्हणाले. तसेच “तुम्ही आमचे ऐकले असते तर आज सत्तेत निम्मे भागीदार झाला असता,” असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
दीपक साळुंखे यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, “ते स्वतःला किंगमेकर म्हणतात. मात्र, ते पांढऱ्या पायांचे असून जिथे जातील तिथे पराभव ठरलेला आहे,” अशी जहरी टीका त्यांनी केली. शहाजीबापू पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले असून विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.



