नागपूर : प्रतिनिधी
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष आज नागपूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रामगिरी’ बंगल्यावर पाहायला मिळाला. या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने एकट्याने २०० हून अधिक नगराध्यक्ष निवडून आणत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.
या विजयानंतर नागपूर जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विजयी प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपच नंबर एकचा पक्ष आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्यातील तब्बल ७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे केवळ ५० नगराध्यक्ष असताना महायुतीचे २१० नगराध्यक्ष निवडून आले. विरोधकांचे किल्ले आम्ही उद्ध्वस्त केले आहेत.”
फडणवीस यांनी निवडणूक आकडेवारी मांडताना सांगितले की, २०१७ च्या निवडणुकांत भाजपचे सुमारे १५०० नगरसेवक निवडून आले होते. मात्र, यावेळी हा आकडा दुपटीने वाढून ३ हजारांच्या पुढे गेला आहे. राज्यातील एकूण नगरसेवकांपैकी ४८ टक्के नगरसेवक हे एकट्या भाजपचे असून, गेल्या ३० वर्षांत एवढ्या मोठ्या संख्येने एका पक्षाचे प्रतिनिधी निवडून येण्याचा हा विक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. हा जनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वास आणि विकासाच्या राजकारणाला मिळालेला कौल असल्याचेही फडणवीस म्हणाले.
नागपूर जिल्ह्यातील निकालांचा उल्लेख करताना फडणवीस यांनी सावनेर नगरपालिकेचा विशेष उल्लेख केला. “सावनेर नगरपालिका पूर्णपणे काँग्रेसमुक्त झाली आहे. वर्षानुवर्षे आपले बालेकिल्ले सांगणाऱ्यांचे किल्ले आमच्या कार्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केले आहेत. काटोलचा अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांमध्ये भाजपला निर्भेळ यश मिळाले आहे,” असे ते म्हणाले.
या यशाचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना दिले. “अभिनंदन माझे नव्हे, तर तुमचे आहे. तुमच्या मेहनतीमुळेच भाजपला हा अभूतपूर्व जनादेश मिळाला आहे. विजयाने मातणार नाही, माजणार नाही हा आपला संकल्प असला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. महापालिका निवडणुकांतही या विजयाचे प्रतिबिंब दिसेल, असा विश्वास व्यक्त करत जिंकलेल्या व न जिंकलेल्या सर्वच शहरांमध्ये चांगले काम करून परिवर्तन घडवण्याचा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.



