मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. १५ जानेवारीला 29 महानगर पालिकांसाठी मतदान पार पडणार आहे तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. सध्या सगळ्यांचे लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे लागले आहे. या ठिकाणी ठाकरेंसमोर गड राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे तर भाजप आणि शिंदेंची शिवसेना सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत.
एकीकडे महायुतीची जागावाटपावर चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसने मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर रमेश चेन्नीथला यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मुंबईचा हवा तसा विकास झालेला आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे रमेश चेन्नीथला म्हणाले आहेत.
तसेच ‘आम्ही भाजप विरोधात आणि शिवसेना ठाकरे गटाविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. या लढाईत सच्चे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष लोकांनी आमच्यासोबत यावे. आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू. आम्ही याबाबतचा जाहीरनामा तुमच्यासमोर सादर करू. त्यामुळे मतदारांना मी आवाहन करतो की, आम्हाला साथ द्या आम्ही मुंबईचा विकास करू.’ असे रमेश चेन्नीथला म्हणाले.


