विजय पाटील जळगाव- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद उफाळले आहेत. ठाकरे गटाने अपेक्षित जागा न दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडीच्या बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 10 वाजता पक्षाच्या कार्यालयात निरीक्षक जयसिंगराव गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा नेत्यांची बैठक होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व कायम असताना महाविकास आघाडीला अद्याप ताळमेळ साधता आलेला नाही. सोमवारी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, महायुतीने एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. मात्र आघाडीत जागावाटपावरून बेबनाव झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मंगळवारी झालेल्या बैठकीत ठाकरे गटाने राष्ट्रवादीने पूर्वी लढविलेल्या जागांवर दावा केला. राष्ट्रवादीने 45 जागांची मागणी केली असता केवळ 20 ते 25 जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सन्मानजनक जागा न मिळाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाने सर्व 75 जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्याचे महानगराध्यक्ष एजाज मलिक यांनी सांगितले. आगामी बैठकीत निवडणुकीसाठी पुढील दिशा ठरविली जाणार आहे.



